<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचं विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी अंशतः लॉकडाऊन जाहीर केलं आहे. या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठींबा आहे. राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे असे आम्ही आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी पाहिजे तिथे सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.</p>
<p style="text-align: justify;">राज्यात सध्या रुग्णालयात खाटांची कमतरता भासत आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरही सरकारने लक्ष द्यावे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांचे खूप हाल होणार आहे. त्यामुळे या सर्व घटकांसाठी सरकारने काहीतरी तरतूद करावी, सोबतच यासाठी बैठक घ्यावी असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठीही सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मदत करण्याचेही त्यांनी आवाहन केलं. मधल्या काळात राज्य सरकार गाफिल राहिल्याने ही वेळ आली असल्याची टीकाही फडवणीस यांनी केली.</p>
<p style="text-align: justify;">राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दरवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचाही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्राने राज्याला भरपूर मदत केली असून मी यापूर्वीच त्याची सविस्तर माहिती दिली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.</p>
<p><strong>काय सुरु, काय बंद </strong></p>
<ul>
<li>शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन</li>
<li>लोकल ट्रेन सुरू राहणार</li>
<li>जिम बंद होणार</li>
<li>अत्यावश्यक सेवांना परवनगी </li>
<li>रेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणार</li>
<li>अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगी</li>
<li>रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील</li>
<li>धार्मिक स्थळांवर निर्बंध असतील</li>
<li>सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंद</li>
<li>गार्डन, मैदाने बंद</li>
<li>जिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला</li>
<li>सिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाही</li>
<li>रिक्षा- ड्रायव्हर + 2 लोक </li>
<li>बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल</li>
<li> टॅक्सीत मास्क घालावा</li>
<li> कार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचना</li>
<li> मंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी</li>
<li>चित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदी</li>
<li>बाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईल</li>
<li>शाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतील</li>
<li>प्रतिबंधित क्षेत्र तयार करा</li>
<li>सोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार</li>
<li>20 लोकांना अंत्यविधींसाठी परवानगी </li>
<li>लग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादित </li>
<li>विमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार</li>
</ul>
<p>गेल्या काही दिवसांपासून रोज 40 हजारांच्या वर रुग्ण समोर येत आहेत. आधीपासूनच राज्यातील पुण्यासह अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. </p>
<p style="text-align: justify;"> </p>